रूपाली पेठकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेन्टीटी (आयएमईआय) क्रमांक नसलेल्या चिनी मोबाईलवर भारतात येत्या 15 एप्रिलपासून बंदी घालण्यात येत असतानाही या मोबाईल फोनची विक्री बाजारात जोरात सुरू आहे. चिनी मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेण्यात येत असला, तरी लोकांमध्ये मात्र त्याबाबत जागृती नसल्याचेच यावरून स्पष्ट होते.आकर्षक मॉडेल, दोन सीम कार्ड, डिजिटल आवाज अशी वैशिष्ट्ये असलेल्या आणि खिशाला परवडणाऱ्या किमती असलेल्या चिनी मोबाईलने गेल्या वर्षभरात ग्राहकांवर चांगलेच गारूड केले आहे. सहासात महिने वापरून फेकून देऊ अशा मानसिकतेतून ग्राहकांनीदेखील या मोबाईलच्या सुमार दर्जाकडे काणाडोळा केला; मात्र देशभरात झालेल्या घातपाती कारवायांत चिनी मोबाईलचा वापर झाल्याचे उघडकीस आले आहे. आयएमईआय क्रमांकामुळे जगभरातून कुठूनही मोबाईलवरून केलेला फोन ट्रॅक करणे सोपे ठरते; मात्र देशात गेल्या वर्षभरात विकले गेलेल्या लाखो चिनी मोबाईलमध्ये आयएमईआय क्रमांकच नसल्याचे उघड झाले आहे. या मोबाईलवरून झालेले फोन ट्रॅप करून त्यांचा मागोवा घेणेही तपासयंत्रणांना कठीण ठरू लागले, त्यामुळे त्यांच्या वापरावर तसेच विक्रीवर बंदी आणावी, असे सीबीआयने केंद्र सरकारला सुचविले होते.आयएमईआय क्रमांक नसलेल्या मोबाईल्सना सेवा पुरविणे 15 एप्रिलपासून बंद करावे, असे दूरसंचार विभागाने मोबाईल सर्व्हिस पुरविणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे. तसेच सध्या आयईएमआय क्रमांक असलेले चिनी मोबाईलही बनावट असल्याचे आढळून येत आहे, त्यामुळे ग्राहकांनी विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता जागरूक होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.चिनी मोबाईलची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मुंबईतील दुकानांमध्ये फेरफटका मारला असता एका मोबाईल विक्रेत्याने एका मोबाईलला चक्क दोन आयएमईआय क्रमांक असल्याचे दाखवले. यावरून हे विक्रेते ग्राहकांची चक्क फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट होते. सरकारने चिनी मोबाईलवर बंदी घातली असली, तरी कालच शहरात कोट्यवधी रुपयांचा माल उतरला असल्याची माहिती या मोबाईल विक्रेत्याने "सकाळ'शी बोलताना दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment